धाराशिव (वृत्तसंस्था) शेतरस्त्याच्या प्रकरणात तहसीलदारांची सही घेऊन अंतिम निकाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका महिला महसूल सहायकांवर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. स्वाती खताळ असे संशयिताचे नाव आहे.
५५ वर्षीय तक्रारदार शेतकरी यांनी त्यांच्या मालकीच्या शेताला जाण्या- येण्यासाठी शेतरस्ता मिळावा म्हणून तहसीदारांकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची सही घेऊन ती तक्रारदारास देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या महसूल सहायक स्वाती खताळ यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे शेतकऱ्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक विकास राठोड, कर्मचारी मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे, सचिन शेवाळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारण्यापूर्वी खताळ यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मात्र तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ जून, २६ जून व १७ जुलै रोजी स्वाती खताळ यांनी लाच मागितल्याची पडताळणी केली होती. त्यामुळे मंगळवारी त्यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.