
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शिवारातील शेत गट क्रमांक ३९४ व ३९५ मध्ये लावलेल्या पपई पिकास अंथरलेल्या ठिंबक नळ्या काढण्याच्या व शेतातील पिकाच्या नुकसानीवरून झालेल्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यासह त्यांच्या मुलाला दांडूका आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा पोलिसांत चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात जोगीलाल शंकर पारधी (वय ६०, रा. रामपुरा, चोपडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. पारधी हे चोपडा शिवारात दिलीप विश्वम चव्हाण यांच्या शेतात निमबटाईने शेती करतात. त्यांनी या शेतात पपई लावली होते. पवन सिताराम पारधी ( रा. रामपुरा पारधीवाडा चोपडा) याच्या आत्याच्या बकऱ्यांचा कळप या शेतात शिरला अन् त्यांनी
पिकाचे व ठिबक सिंचन नळ्यांचे नुकसान केले. तक्रारदाराने या बकऱ्या ‘ठेंगा सोसायटी’ मध्ये नेण्याचे ठरवले होते, याचा राग आल्याने पवन पारधी, नीलेश बापू भालेराव, विक्की अशोक पारधी आणि मयूर यादव सोनार (सर्व रा. चोपडा) यांनी जोगीलाल पारधी आणि त्यांचा मुलगा दीपक पारधी यांना गाठले. तर, पवन पारधी याने जोगीलाल यांना लाकडी शिंगाड्याने डोक्यावर आणि छातीवर तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जोगीलाल पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि. सचिन चौधरी करत आहेत.

















