
जळगाव (प्रतिनिधी) – शेतीच्या वादातून चौघांनी जितेंद्र वसंत साबळे (वय ४३) व त्यांचे वडील वसंत मुरलीधर साबळे या बापलेकाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आव्हाणे येथे जितेंद्र साबळे हे वास्तव्यास असून ते दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास वडीलांसोबत जात होते. त्यावेळी संशयित लोकेश साबळे याने वसंत साबळे यांना शिवीगाळ करीत मारहाण करुन त्यांच्या बोटाला चावले. तसेच तेथे पडलेला काचाने जितेंद्र साबळे याच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर जितेंद्र यांचे चुलत भाऊ धीरज साबळे हे ठिबकचे सामान घेण्यासाठी जात असतांना त्यांना देखील चौघांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, त्यांनी लागलीच तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अरुण रामदास साबळे, राजेंद्र रामदास साबळे, तुषार राजेंद्र साबळे व लोकेश अरुण साबळे (सर्व रा. आव्हाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.
















