मुंबई ( प्रतिनिधी) – डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईत आणखी एक मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. भांडुप परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त बँक व्यवस्थापकाला तब्बल ५० दिवस डिजिटल अरेस्टची बतावणी करत सायबर भामट्यांनी ४०.९० लाख रुपये लुबाडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, या ६१ वर्षीय तक्रारदाराला १० मार्च २०२६ रोजी ‘सिग्नल’ अॅपवरून एका अज्ञात क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदाराचे नाव दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांच्या मोबाईल डेटामध्ये आढळल्याचा दावा केला. तसेच पीडिताच्या नावावर कर्नाटकातील हुबळी येथे बँक खाते उघडून त्याद्वारे २.६५ कोटी रुपयांचे मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत या ज्येष्ठ नागरिकाला धमकावण्यात आले.
या सायबर ठकांनी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे नाव घेत पीडिताला अटक व कायदेशीर कारवाईची भीती दाखवली. त्यानंतर डिजिटल अरेस्ट असल्याचे सांगून पीडिताला घरातील एका रूममध्ये एकटे राहण्यास आणि सतत व्हिडीओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी फोन बंद केले. फसवणुकीच जाणीव झाल्यानंतर पीडिताने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधत पोलिसांत तक्रार दाखल केली प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
असे पाठवले पैसे
भीती आणि मानसिक दडपणाखाली या तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केले. ११ मार्च रोजी करूर वैश्य बँकेच्या खात्यात २.९० लाख रुपये, १३ मार्च रोजी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात २८ लाख रुपये, तर १८ मार्च रोजी इंडसइंड बँकेच्या खात्यात १० लाख रुपये जमा करण्यात आले. यातील काही रक्कम पत्नीने घेतलेल्या कर्जातून उभी करण्यात आली होती.
















