
भुसावळ (प्रतिनिधी) – दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या धान्य व्यापाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत रस्त्यात अडवले. व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्याकडील दोन लाखांहून अधिक रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून तिघे दुचाकीवरून पसार झाले. सोमवारी रात्री सुमारे नऊ वाजता टीव्ही टॉवर परिसरात ही घटना घडली. यामुळे भुसावळातील व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत.
अजय प्रेमचंद कोटेचा (वय ५०) हे त्यांचा पुतण्या मीत कोटेचा याच्यासह अण्णा भाऊ साठे मार्केटमधील दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. भूमी अभिलेख कार्यालयासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तर, टीव्ही टॉवरच्या मागील बाजूस असलेल्या निवासस्थानाकडे जाताना बंद असलेल्या पथदिव्यांमुळे अंधार असलेल्या ठिकाणी तिघांनी अचानक कोटेचा यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यामुळे त्यांना काही क्षण दिसेनासे झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला करून रोकड असलेली पिशवी हिसकावली आणि दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले. या मारहाणीत कोटेचा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम भुसावळातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यावस्थ असल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांनी कोणत्या मार्गाने व्यापाऱ्याचा पाठलाग केला आणि लुटीनंतर कोणत्या दिशेने पलायन केले, याचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच व्यापाऱ्याच्या दुकानापासून घटनास्थळापर्यंतच्य मार्गावरील संशयास्पद हालचालींच माहितीही पोलिसांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
पाळत ठेवून कट रचल्याचा संशय
व्यापारी दुकान कधी बंद करतात आणि कोणत्या मार्गाने घरी जातात याची माहिती हल्लेखोरांना आधीपासून होती का, याबाबत संशय व्यक्त होत आहे. दुकानातून निघाल्यापासून पाठलाग करून अंधाराच्या ठिकाण हल्ला करण्यात आल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असण्याची शक्यत आहे. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची माहिती स्पष्ट होणार आहे.
यापूर्वीही व्यापाऱ्याला लुटले
साकेगाव शिवारात २० एप्रिल २०२१ रोजी भाजीपाला व्यापारी विनोद परदेशी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हल्ला करून तीन लाखांचा ऐवज लुटला होता. या घटनेची आठवण ताजी असतानाच पुन्हा व्यापाऱ्याला लक्ष्य करून लूट झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.















