जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेकडून पक्षसंघटन विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा चांगलाच समाचार घेतला. हे ३० वर्षे मुक्ताईनगरमध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आपण दोन वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू’, असे ना. पाटील यांनी ठणकावून सांगितले.
राज्याच्या सत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेकडून पक्षसंघटन विस्तारासाठी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. गेली ३० वर्षे खडसेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरात शिवसेनेने ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या संकल्पनेवर नुकतीच आमसभा घेतली. या आमसभेत आजवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विकासाचा अनुशेष कसा राहिला? हा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने खडसेंच्या कारकिर्दीवरच बोट ठेवले. शिवसेनेच्या या भूमिकेची जोरदार चर्चा आहे.
राज्यात भाजप-सेनेत युती असतानाही एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कधीही शिवसेना वाढू दिली नाही, हे शल्य शिवसैनिकांना नेहमीपासून आहे. याशिवाय युती तोडल्याची घोषणा देखील खडसेंनीच केली होती. तेव्हापासून शिवसैनिक खडसेंवर काहीसे नाराज आहेत. ही नाराजी मुक्ताईनगरात सातत्याने समोर येतच असते. म्हणूनच याठिकाणी खडसे सेनेच्या रडारवर असतात. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी झालेल्या आमसभेत खडसेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. खडसेंवर निशाणा साधताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘हे ३० वर्षे मुक्ताईनगरमध्ये मूलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. मुक्ताईनगर हे ना धड खेड आहे, ना शहर. याठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही, अशी अवस्था यांनी शहराची करून ठेवली आहे. एकीकडे मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आपण दोन वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू’, असे गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले.
एकनाथराव खडसेंना सलग तिसरा धक्का
गेल्या काही महिन्यांपासूनचा घटनाक्रम पाहिला तर मुक्ताईनगरात शिवसेनेने एकनाथ खडसे यांना सलग तिसरा धक्का दिला आहे. खडसेंना सर्वात पहिला धक्का बसला तो कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. याठिकाणी खडसेंचे वर्चस्व असताना शिवसेनेने ५ जागांवर मुसंडी मारली होती. त्यामुळे खडसेंच्या पॅनलला एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही. ही निवडणूक होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच, शिवसेनेने मुक्ताईनगर नगरपंचायतीतील काही सदस्य फोडले. हे सदस्य भाजपचे असले तरी ते खडसे समर्थक होते. त्यामुळे हा देखील खडसेंना धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात मुक्ताईनगरच्या विकासाच्या मुद्द्यावरून खडसेंना लक्ष्य केले. मित्रपक्षात असलेल्या खडसेंना हा धक्काच मानला जात आहे.