भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी वाहनाने अॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे (वय ४०) या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासोबत खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अॅक्टिवा (एमएच १९, डीआर ३२४१) वरून सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्याकडून वराडसिमकडे जात होत्या. २८ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गोजोरे गावाकडून नशिराबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी (एमएच ०४, ईडी ५६२) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात पती अन् पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर गावातील उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच वेफर्स व्यवसाय करणाऱ्या मंदाबाई भय्या कोळी यांनी तत्काळ मदत करत दोघांना रिक्षाने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना गंभीर इजा झाल्याने आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. तर उमाकांत भारंबे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातातील ओमनी चालकाचे नाव समजू शकले नसून संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. तर, घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पो.नि. महेश गायकवाड, पो.उ.नि. संजय कंखरे व पो.हे.कॉ. धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून तपास पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. धिरज मंडलिक करत आहेत.
चौफुलीवर गतीरोधकाची मागणी
नशिराबाद ते बोदवड रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर डंपर, ट्रक व इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुलीवर दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसवावेत तसेच परिसरातील पुलाला कठडे उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी केली आहे.

















