धरणगाव (प्रतिनिधी) जलदूत फाऊंडेशन धरणगाव संस्थेमार्फत दत्तक वृक्ष योजना २०२१ – ऑक्सिजन पार्कचा शुभारंभ गुरुवारी दि. १५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता चिंतामणी पार्क, श्री चिंतामणी मोरया मंदिरामागे धरणगाव येथे होणार असून सदर शुभारंभ धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाच्या विकासाची लोकचळवळ उभारणारे चैत्राम पवार यांच्या हस्ते होणार आहे.
बारीपाडा गावाच्या शेजारी ४४५ हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धन होत आहे. त्यामुळे जैविक विविधता निर्माण करण्यात यश मिळाले. त्यासाठी गावाने गावांसाठी काही कठोर नियम तयार केले. त्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्षांना हक्काचे जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी तसेच वनस्पती यांचे संवर्धन झाले.
पाण्याचे दुर्मिक्ष असलेल्या या परिसरात गावक-यांच्या श्रमदानातून ४७० पेक्षा जास्त दगडी बंधारे, सलग समतल चर तसेच जंगलातील घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे या गावांसह परिसरातील आठ गावांना पाणी पुरवठा होत आहे. ऐकेकाळी बारीपाडयासाठी मांजरी गावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे परंतु आता बारीपाडयातून ८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. खडतर अश्या लोकचळवळीची वाट सुकर करून यशस्वी वाटचाल करणारे म्हणून चैत्राम पवार यांची ओळख आहे.
दत्तक वृक्ष योजना २०२१ – ऑक्सिजन पार्क ही योजना धरणगाव शहरातील श्री चिंतामणी मोरया मंदिरामागे असलेल्या चिंतामणी पार्क येथील मोकळ्या जागेत साकारला जाणार असुन या योजनेच्या माध्यमातून परिसरात हिरवे जंगल उभे केल्याने वातावरण थंड राहून, जैवविविधतेही भर पडणार असून पक्षांचा अधिवास ही वाढणार आहे. या सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, विवाहप्रीत्यर्थ, वाढदिवसाच्या निमित्ताने, विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावता येईल. त्यासाठी रु. ११०० एवढी रक्कम जलदूत फाऊंडेशन धरणगाव ह्या संस्थेला देणगी स्वरुपात दिल्यास झाडाची देखभाल, मशागत, पाण्याची उपलब्धता याची संपूर्ण जबाबदारी जलदूत फाऊंडेशन धरणगावची राहील. आपल्या स्मृतींना मूर्तरूप देण्यासाठी जलदूत फाऊंडेशन धरणगावमार्फत देणगीदारांच्या/नातेवाईकांच्या नावाने एक पाटी झाडाच्या संरक्षक जाळीवर लावण्यात येईल, सोबत देणगीदाराचे नाव देखील राहील.
सदर योजना यशस्वी करणेसाठी प्रा. ए आर पाटील, एस एस पाटील, प्रा डी डी पाटील, अंकुश पाटील, मनोज गुजर, संजय तोडे, प्रा डॉ दिपक साळुंखे, धवल जैन, अमोल पाटील, सुजित ठाकूर, कन्हैय्या रायपूरकर, नितेश महाजन, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, इंजी सुनील शाह, योगेश भाटीया, मनोज महाजन, गौरव देशमुख, दिनेश मोहकर, अॅड. संदीप पाटील, डॉ. आशिष सूर्यवंशी, विक्रांत पाटील आदी परिश्रम घेत आहेत.















