जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने तापमानाचा पारा घटला असल्याने नागरीकांना ‘मे हिट’ पासून बचाव झाला आहे, मा तीन दिवस अवकाळी पावसासह गारपीट तडाखा बसल्यानंतर पुन्हा दोन दिवस हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दि.१० व ११ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सलग तीन दिवस शहरासह जिल्हयात अवकाळी पावसाने व गारपिटीने झाडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा, मका, ज्वारीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हाभरात जवळपास १२ हजार हेक्टरवर पिकांना मोठी झळ पोहचली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून १० व ११ रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहचला होता. ढगाळ वातावरणाने तापमान किंचतसे कमी झाले, मात्र एप्रिल अखेर पुन्हा पारा वाढला. मात्र में हिट होईल असा अंदाज असतांना दुसऱ्याच आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. आता दोन दिवस मुसळधार व अति मुसळधार पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या दोन दिवसात किमान तापमान ३६ ते ३७अंशावर राहील असा अंदाज आहे.